कन्नड | प्रतिनिधी :

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अथक परिश्रमांची जोड दिल्यास शेतीतही उल्लेखनीय यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील युवा शेतकरी सागर सोनवणे यांनी घालून दिले आहे.
अवघ्या २५ व्या वर्षी सागर सोनवणे यांनी महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च ‘कृषी भूषण युवा शेतकरी पुरस्कार’ पटकावत कन्नड तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विशेष म्हणजे, देशातील सर्वात तरुण ‘कृषी भूषण युवा शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी होण्याचा ऐतिहासिक बहुमानही त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कन्नड तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.
सागर सोनवणे यांनी आधुनिक शेती पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण कृषी प्रयोगांच्या माध्यमातून शेतीत उल्लेखनीय यश मिळवत युवा शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविले.
त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून राज्यातील युवा शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
