कर्जत | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील एकसळ वाडी परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
वाडीतील अंतर्गत रस्ते चिखलमय झाल्याने पायी चालणे कठीण झाले आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या समस्येची तातडीने दखल घेत संबंधित ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी तसेच कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि एकसळ वाडीतील नागरिकांना या समस्येतून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
