
आजरा | प्रतिनिधी
विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून मराठी शाळा बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, अशी ठाम मागणी करत काल ‘मराठी शाळा वाचवा’ या घोषणेखाली आजरा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई (पेरणोली) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चानंतर मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले. मोर्चातील उपस्थिती आणि शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय संख्या पाहून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या कार्यकर्ते व नेत्यांचा अभिमान वाटत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या आंदोलनात एक विशेष लक्षवेधी बाब म्हणजे आजरा तालुक्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा (वाटंगी) यांची उपस्थिती. शारीरिकदृष्ट्या आजारी असतानाही त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. थकवा जाणवत असल्याने ते मोर्चातील सहभागींसोबत बसून आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या या कृतीने उपस्थित शिक्षक व कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आदर आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.
पाच वर्षे सभापतीपदावर असताना प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेले भरीव काम अनेकांना आठवले. “सत्तेच्या खुर्चीवरून माणूस गेला तरी त्याचं कर्म शिल्लक राहतं” हे वाक्य त्यांच्या कार्यातून पुन्हा अधोरेखित झाले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
अनेक वर्षे स्वतःच्या पदरमोडीतून मराठी हायस्कूल चालवणारे आणि आजही आजारी अवस्थेत मराठी शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले माननीय अल्बर्ट डिसोजा यांची उपस्थिती सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली.
प्राथमिक शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांची चाललेली धडपड अभिमानास्पद असून, मराठी शाळा वाचवण्याचा हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मराठी भाषा, मराठी शाळा आणि ग्रामीण शिक्षण वाचवण्यासाठी हा लढा अखंड सुरूच राहील, असा ठाम संदेश या मोर्चातून देण्यात आला.









