प्रतिनिधी – संतोष आखडमल
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे हरवलेल्या महिलेचा तब्बल 23 दिवसांनंतर शेताच्या बांधावर मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे.
मृत महिलेचे नाव राणूबाई ईशी (वय 65 वर्षे) असे असून त्या आर.पी.आय. पक्षाच्या शहादा तालुक्यातील माजी महिला अध्यक्षा होत्या. सामाजिक कार्यामुळे त्या परिसरात परिचित होत्या. राणूबाई ईशी या 8 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर जवळपास तीन आठवडे उलटल्यानंतर त्याच गावातील एका शेताच्या बांधावर त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
घटनेची बातमी समजताच समाजातील नागरिक आणि बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा घातपात आहे की अपघात, याबाबत विविध चर्चा सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमुळे कहाटुळ व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. या घटनेमुळे तालुक्यातही मोठी चर्चा सुरू झाली असून नागरिकांचे लक्ष तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे.




