
देवळी | प्रतिनिधी :
देवळी तालुक्यातील उसनापुर ते वापगाव या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा संघर्ष मोर्चा व क्रांतिकारी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा परिषद विभाग प्रमुख नितेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रोशन, सोहम, आर्यन शेळके, सौरभ निहारे, हर्षल भलावी, महेश यडमे, भास्कर केवदे, आदर्श डोंगरे आणि साहिल केवदे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी व शेतकरी प्रवास करतात. मात्र, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहनांचे नुकसान होत असून अपघाताची भीती कायम आहे.
उसनापुर–वापगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा संघर्ष मोर्चा व क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.


