देवळी | प्रतिनिधी
देवळी तालुक्यातील तांभा गावात गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गावातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्ट्रीट लाईट बंद झाल्यानंतरही संबंधित यंत्रणेकडे किंवा महावितरण (MSEDCL) कार्यालयाकडे तक्रार करण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे.
अंधारामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्री घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. तसेच चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वाढली असून साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ग्रामपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाशी समन्वय साधावा आणि बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटची त्वरित दुरुस्ती करून गावातील वीजप्रकाश व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी तांभा येथील नागरिकांनी केली आहे.


