
नितेश गट्टीवार गडचिरोली:दि.६मार्च
शिवसाम्राज्य प्रतिष्ठान व समस्त ग्रामवासीय देलणवाडी यांच्या वतीने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत देलनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला महेंद्र ब्राम्हणवाडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करून अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पाडले व उपस्थितांना मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा उल्लेख करत स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचा गौरव केला.
पुढे बोलताना महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अदम्य धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टीच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या काळात अनेक अडचणी, संकटे आणि परकीय सत्तांचा दबाव असतानाही शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्ता, पराक्रम आणि रणनीतीच्या जोरावर स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांनी सामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत न्याय, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देणारा आदर्श राज्यकारभार उभारला. त्यांच्या राज्यकारभारात सर्व धर्म आणि जातींना समान वागणूक देण्यात आली, तसेच महिलांच्या सन्मानाचे आणि जनतेच्या सुरक्षेचे विशेष भान ठेवले गेले. त्यामुळे शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.तसेच त्यांनी आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि आदर्शांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य आपल्याला समाजासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा देते. तरुणांनी शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या आधारावर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजात एकता, बंधुता आणि स्वाभिमान टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.
शेवटी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा जपणे, त्यांच्या आदर्शांवर चालणे आणि समाजात स्वाभिमान, एकता व राष्ट्रप्रेम वाढवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणेचा स्रोत असून त्यांच्या स्मरणातून आपल्याला राष्ट्रसेवेची आणि समाजहिताची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम,माजी आमदार कृष्णाजी गजभे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शीतलताई सोमनानी, चंदाताई कोडवते, नितीन कोडवते,प्रियांकाताई कुमरे, सौं. पूनमताई गुरनुले, शोभाताई सोमनाणी,डी के. मेश्राम , भाईचंद गुरनुले, रामदास डोंगरवार,दिलीप कुमरे, माणिक पेंदाम, राहुल धाईत, मनोहरराव तितीरमारे, मिनेश्वर जांभुळे सह मान्यवर, नागरिक, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते




