*२ लाखापर्यंत कर्जमाफी केल्याबद्दल लोणीकरांनी महाराष्ट्र सरकारचे मानले आभार; मागील अधिवेशनात आपण सरसकट कर्जमाफीची केली होती याची करून दिली आठवण
**मंठा व परतुर क्रीडा संकुलासाठी २० कोटी निधी, वन्यजीवांपासून संरक्षणासाठी सौर कुंपण पायलट प्रकल्पाची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी
**गोदावरी-दुधना-पूर्णा नदीजोड, तीर्थक्षेत्र विकास आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकांसह आमदार लोणीकरांनी मांडले अनेक महत्त्वाचे प्रश्न
**परतुर मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत आमदार बबनराव लोणीकर यांची जोरदार मागणी
*मुंबई प्रतिनिधी: सर्वप्रथम राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. मागील अधिवेशनात आपण सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी केली होती, असे सांगत त्यांनी नमूद केले की शासनाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत दिलासा दिला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२६ वरील चर्चेदरम्यान माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात प्रभावी मांडणी करत अनेक महत्त्वपूर्ण मागण्या सभागृहासमोर मांडल्या. शेतकरी, विद्यार्थी, युवक, कष्टकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित प्रश्न उपस्थित करत त्यांनी परतुर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची मागणी
केली.राज्यात क्रीडा सुविधांवर भर देण्यात येत असताना परतुर आणि मंठा येथील तालुका क्रीडा संकुलांची जवळपास ८० टक्के कामे पूर्ण झाली असून निधीअभावी ती रखडली आहेत. ही कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, क्रीडाप्रेमी युवक व युवती क्रीडा संकुल पूर्ण होण्याची वाट बघत आहेत अशी आठवण करून देत निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी
आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मंठा तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प, लिंबे वडगाव – पाटोदा प्रकल्प, खोराड सावंगी प्रकल्प तसेच परतुर तालुक्यातील भोंगाने दहिफळ येथील नागतास प्रकल्प, श्रीष्टी येथील कसुरा प्रकल्प आणि हस्तुर प्रकल्प परिसरात हरिण, काळवीट, रोही व रानडुक्कर यांच्या कळपांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या भागात सौर कुंपणाचा पायलट प्रकल्प राबविण्याची मागणी त्यांनी
केली.अनुसूचित जातीच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली असून मंठा व परतुर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहांसाठी आवश्यक भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच परतुर, मंठा आणि आष्टी येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकांची मागणीही आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा अधोरेखित केली.कृषी प्रक्रिया, सिंचन प्रकल्प आणि औद्योगिक विकासासाठी अर्थसंकल्पात मोठ्या
प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने परतुर मतदारसंघातील आकणी बरबडा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देऊन गावांचे पुनर्वसन आणि कंदरभरणीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविताना प्रलंबित वीज बिलाची अट असल्याने अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत. ही अट शिथिल करून टप्प्याटप्प्याने वीज बिल वसुली करत लाभार्थ्यांना तात्काळ सोलार बसवण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. तसेच सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्राने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी अभिनंदन केले.
या योजनेमुळे शेतीसाठी ऊर्जा उपलब्धतेत मोठा फायदा होणार असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, भीमाशंकर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर या पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर परतुर मतदारसंघातील नांगरतास, शंभू महादेव आणि गोखेश्वर या धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून पर्यटन विकास करावा, अशी मागणीही आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.
याशिवाय नैसर्गिक व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर देत रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षणासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.नदीजोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर परतुर मतदारसंघातील गोदावरी, दुधना आणि पूर्णा या तीन नद्यांचा नदीजोड प्रकल्प मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक विकासासाठी दीर्घकालीन पाण्याचे नियोजन शक्य होईल,
असे आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात आल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. मात्र या योजनेतील दोन लाख रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते तीन लाख रुपये करण्यात यावे तसेच मंजुरीसाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणीही आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.शेवटी शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांना प्राधान्य देणारा तसेच शेती, सिंचन, रस्ते विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला २०४७ पर्यंत विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने वाटचाल करणारा असल्याचे सांगत आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले. विधानसभेत आमदार बबनराव लोणीकर यांनी मांडलेल्या या मागण्यांमधून परतुर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार लोणीकर यांची असलेली सजगता आणि बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.






