महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग, सांगली अंतर्गत हिराबाग केंद्र ते कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. या गळतीचे दुरुस्ती काम अत्यंत तातडीने हाती घेण्यात आले असून, यामुळे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी आकाशवाणी जलकुंभाचा (पाणी टाकी) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. १०० फुटी रस्ता, अरिहंत कॉलनी कॉर्नर येथे ४०० मिमी व्यासाच्या डी.आय. (DI) रायझिंग मेन लाईनला मोठी गळती लागल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. भविष्यात पुन्हा गळती होऊ नये यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि टिकाऊ दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. या मोठ्या स्वरूपाच्या कामासाठी उद्या दि. ११ मार्चच्या रात्रीपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. आकाशवाणी टाकी परिसर: या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बुधवारी पूर्णपणे बंद राहील. हिराबाग झोन: दुरुस्ती कामामुळे हिराबाग झोनमधील इतर जलकुंभ (टाक्या) देखील कमी प्रमाणात भरल्या जाणार आहेत. परिणामी, या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा खंडित असलेल्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभाग, सांगली मार्फत संबंधित बाधित क्षेत्रांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि “मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती ही तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असून ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आकाशवाणी आणि हिराबाग झोनमधील नागरिकांनी या तांत्रिक अडचणीची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे.”नागरिकांनी आजच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून दुरुस्तीच्या काळात अडचण येणार नाही.










