माळशिरस प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजीराजे यांचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची चैत्र यात्रा पाडव्यापासून उत्साहात सुरू झाली आहे. यात्रेत पंचमीला हळदी व अष्टमीला लग्न समारंभ पार पडला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रविवार (ता. २९) रोजी एकादशी व सोमवारी (ता. ३०) द्वादशी असून हा यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी शंभू महादेवाला जलाभिषेक केला जातो.
मुंगी घाटात भाविकांची गर्दी :
सासवड व पंचक्रोशीतील मानाच्या कावडी मुंगी घाटातून शिखर शिंगणापूरकडे येत असून हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मुंगी घाटात दाखल होत आहेत.
विशेष आकर्षण :
सासवड येथील तेल्या भुत्याची मानाची कावड कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय मानवी साखळीच्या सहाय्याने वर नेली जाते, हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
पोलीस बंदोबस्त सज्ज :
यात्रेनिमित्त मुंगी घाट परिसरात सोलापूर जिल्हा पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी मुंगी घाट येथे भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला व भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सूचना दिल्या.
बंदोबस्ताची माहिती :
- पोलीस अधिकारी : ६
- पोलीस अंमलदार : ८२
- होमगार्ड : ३०
- आरसीपी पथक : १
यावेळी सपोनि विशाल वायकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.








