सेलू प्रतिनिधी | यवतमाळ :
दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, युडीआयडी (UDID) कार्ड आधारशी लिंक न केल्यास अनुदान बंद होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुमारे २० हजारांहून अधिक दिव्यांग लाभार्थी असून, त्यापैकी जवळपास १३ हजार ४८४ लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही किंवा ते लिंक केलेले नाही. त्यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
काय करावे लागेल :
- युडीआयडी कार्ड तयार करणे
- आधारकार्डशी लिंक करणे
- संबंधित शासकीय कार्यालयात नोंदणी पूर्ण करणे
ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे सुमारे अडीच हजार रुपये अनुदान बंद होऊ शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
कारवाईचा इशारा :
नियमांनुसार कागदपत्रे पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, अपूर्ण नोंदणी किंवा चुकीची माहिती आढळल्यास अनुदान थांबवले जाईल.
ऑनलाइन प्रक्रिया सुरू :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान युडीआयडी-आधार लिंकिंगसाठी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अनेकांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे.
या योजनांसाठी अनिवार्य :
- संजय गांधी निराधार योजना
- श्रावणबाळ सेवा योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी तातडीने संबंधित कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागाने केले आहे.









