मच्छिगट्टा (मुलचेरा) | प्रतिनिधी
तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट सेवा अत्यावश्यक बनली असताना मच्छिगट्टा (मुलचेरा) परिसरात Reliance Jio ची इंटरनेट सेवा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून विस्कळित झाल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मच्छिगट्टा येथील जिओ टॉवरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे ऑनलाईन व्यवहार, शैक्षणिक कामे, बँकिंग सेवा तसेच दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, नेटवर्कमध्ये सतत अडथळे येत असून कॉल कट होणे, आवाज तुटणे, 5G सेवा गायब होणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. तसेच WhatsApp, YouTube आणि Facebook सारख्या अॅप्सही व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गावात जिओ टॉवर असतानाही इंटरनेट सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हजारो ग्राहकांना या समस्येमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, इंटरनेटवर अवलंबून असलेल्या सर्व सेवांचा बट्ट्याबोळ झाला आहे.
दरम्यान, जिओ कंपनीने लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.








