प्रतिनिधी :
अकोला : अकोला–अकोट मार्गावरील मोठमोठ्या भेगा, टोलनाका परिसरातील खराब रस्ता तसेच गांधीग्राम–धामणा रस्त्याची झालेली दुरवस्था याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गांधीग्राम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना उपनेते तथा आमदार नितीनभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
अकोला ते अकोट दरम्यान देवरी फाटा ते शेगाव या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांचे दररोज अपघात होत असून, गेल्या दोन महिन्यांत तीन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम न केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आणि तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला इशारा देत, लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर, मुकेशभाऊ मुरूमकार, दिलीपभाऊ बोचे, विकासराव पागृत, संजय भांबेरे, आशिष गावंडे, सौरभ वाघोडे, अक्षय वाघोडे, राहुल कराळे, भूषण भिरड, अवी गावंडे, अभय खुमकर, गोपाल इंगळे, शिवदास कड, आनंदराव अढाऊ, संजय मांजरे, वासुदेव वकटे, प्रदीप फुकट, विठ्ठल पाचपोर, मुन्नाभाऊ साखरकर, संतोष मोडक, जि.प. सदस्य प्रशांत अढाऊ यांच्यासह शेकडो शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
