‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ ग्रंथाचे नागपुरात प्रकाशन; साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत वाङ्मयीन सोहळा संपन्न
अमरावती
नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध संकलनकार लेखक विभूतीचंद्र गजभिये यांनी १९९१ ते २०२६ या कालावधीत विविध मासिके, दिवाळी अंक, साप्ताहिके, वर्तमानपत्रे तसेच अप्रकाशित साहित्यामधून प्रसिद्ध कथाकार डॉ. रवी दलाल यांच्या निवडक १९ कथा संकलित करून “रवी दलाल यांच्या निवडक कथा” हा दर्जेदार कथासंग्रह प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह, लष्करीबाग येथे आयोजित या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे होते, तर उद्घाटक म्हणून डॉ. लालसिंग मिसाळ उपस्थित होते. व्यासपीठावर प्रसिद्ध कथाकार डॉ. रवी दलाल, मा. बाळासाहेब काळे (निवृत्त उपसंचालक, भूमिअभिलेख पुणे), प्रबोधनकार अशोक सरस्वती, रामभाऊ डोंगरे (महाअंनिस), विकास राऊत (अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती), प्रा. वीरेन्द्रबाबू इंगळे, डॉ. भंते अभयनायक, डॉ. कृष्णकांत डोंगरे आणि लेखक विभूतीचंद्र गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शोभा पाटील यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले, तर प्रा. वीरेन्द्रबाबू इंगळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते “रवी दलाल यांच्या निवडक कथा” या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना कथाकार डॉ. रवी दलाल यांनी सांगितले की, “माझ्या कथा अनेक वर्षे विविध माध्यमांत विखुरलेल्या होत्या. त्या एकत्र करून नव्या स्वरूपात वाचकांसमोर आणणे हे अत्यंत कठीण काम होते. मात्र विभूतीचंद्र गजभिये यांनी हे कार्य अत्यंत अभ्यासपूर्वक आणि सामाजिक जाणिवेतून केले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “विभूतीचंद्र गजभिये यांनी संघर्षातून साहित्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनाची दखल घेत वेस्ट बंगाल सरकारने त्यांना ‘स्वामी विवेकानंद प्राइड अचिव्हर अवॉर्ड’ देऊन गौरविले आहे.”
प्रसिद्ध कीर्तनकार अशोकभाऊ सरस्वती यांनीही गजभिये यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना, “ते शोषित-वंचितांच्या मदतीला धावून जाणारे त्यागमयी व्यक्तिमत्त्व आहे,” असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात ई. झेड. खोब्रागडे यांनी परिवर्तनवादी साहित्याची गरज अधोरेखित करताना सांगितले की, “रवी दलाल यांच्या कथा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याइतक्याच प्रभावी आणि समाजजागृती करणाऱ्या आहेत. त्या वाचल्याशिवाय त्यांच्या ताकदीची जाणीव होणार नाही.”
उत्तर देताना लेखक विभूतीचंद्र गजभिये म्हणाले, “साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब आहे. सामाजिक आणि धार्मिक घडामोडींचे वास्तव दर्शन घडविण्याची जबाबदारी लेखकाची असते. हे भान मला रवी दलाल यांनी दिले. त्यामुळे ते माझे साहित्यिक गुरू आहेत.” त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पत्नी दर्शना गजभिये यांना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सागर भोवते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य वसंत वावरे यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.
