महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. चतुरबेट गावात अतिवृष्टीमुळे मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान, कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, नदी, ओढे, पूल आणि दरडप्रवण भागांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सध्या तालुक्यात पावसाचा जोर कायम असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
