चिखलदरा : मेळघाटातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा परिसरात सध्या निसर्गाने हिरवाईची चादर पांघरली असून, सर्वत्र नयनरम्य वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळ्याच्या आगमनानंतर येथील डोंगररांगा, दऱ्या आणि धबधबे अधिकच आकर्षक बनल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेळघाट हा अमरावती जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गसंपन्न भाग असून, चिखलदरा हे त्यातील प्रमुख पर्यटन केंद्र मानले जाते. राज्यासह परराज्यातूनही पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दाखल होत असतात. त्यामुळे पर्यटन हंगामात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेता अमरावती ग्रामीण पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चिखलदरा पोलिसांकडून विविध ठिकाणी विशेष नियोजन करण्यात येत आहे. मुख्य मार्गांवर वाहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तसेच पर्यटकांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत आहे.
पर्यटनस्थळी शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पर्यटकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
