मुंबई/पुणे :
इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या NCERT पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळल्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही याचिका दाखल करण्यात आली असून या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे.
याचिकाकर्ते:
राजे मुधोजी महाराज भोसले (नागपूर), शिवाजीराजे जाधव (सिंदखेडराजा), ऋषिकेश निकम पाटील (छत्रपती संभाजीनगर), रघुजीराजे आंग्रे (अलीबाग), रविंद्र पडवळ (पुणे), कुणाल मालुसरे (पुणे), राम नारायण मराठा (पानीपत, हरियाणा), शरद मोडे (बीड) आणि अर्थव मारणे (पुणे) यांचा समावेश आहे.
मुख्य मुद्दे:
याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, मराठा साम्राज्याने अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर अधिराज्य गाजवले होते. संबंधित नकाशा वगळल्यामुळे विद्यार्थ्यांना अपूर्ण व चुकीची ऐतिहासिक माहिती दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच मराठा साम्राज्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते राष्ट्रव्यापी सामर्थ्याचे प्रतीक होते. त्यामुळे हा नकाशा हटविणे हा ऐतिहासिक अस्मितेचा प्रश्न असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
मागणी:
मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून NCERT ला सुधारित पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया:
“भावी पिढीला सत्य आणि संपूर्ण इतिहास मिळावा, यासाठी हा न्यायालयीन लढा उभारला आहे,” असे मत श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी व्यक्त केले.
पुढील घडामोडी:
या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून, इतिहास अभ्यासक आणि विविध संघटनांकडून या उपक्रमाला पाठिंबा मिळत आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद पुणे येथील पत्रकार भवनात पार पडली.






