पेण | प्रतिनिधी
पेण तालुक्यातील बालगंगा प्रकल्प पुनर्वसन संदर्भात दिनांक ५ मे २०२६ रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते.
मंत्रालयीन दालनात झालेल्या या बैठकीत बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजप रायगड जिल्हा नेते शिवाजी पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या प्रक्रियेला गती मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जात आहे.
बैठकीस सिडको अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी म्हणून अविनाश पाटील, नंदू पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने पुनर्वसन प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या बैठकीला पाठिंबा देण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच उरणचे आमदार महेश बालदी हेही उपस्थित होते.
बालगंगा प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे भाजप नेते शिवाजी पाटील यांनी सांगितले. तसेच आमदार रविशेठ पाटील यांच्या विशेष पुढाकारामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील कार्यवाहीला सकारात्मक दिशा मिळाल्याचे नमूद करत त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.











