कन्नड | प्रतिनिधी
कन्नड पंचायत समिती कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार संजनाताई जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अधिकारी आणि कर्मचारी यांनी बेजबाबदारपणे काम करू नये. जनतेच्या प्रश्नांबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या की, तालुक्यात ‘जल जीवन मिशन’ योजनेचा केवळ खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रूईखेडा गावात अत्यल्प काम करूनही तब्बल २० लाख रुपये उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “अशाच प्रकारे इतर कोणत्या गावांमध्ये गैरप्रकार झाले आहेत का, याची माहिती घेऊन यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. चुकीच्या कामकाजाबाबत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला तहसीलदार सारिका भगत, पंचायत समिती सभापती सुप्रिया अनिल घुगे, बाजार समिती सभापती मनोज राठोड, सचिव साईनाथ जाधव, योगेश घाडबले आदी उपस्थित होते.











