शहादा,दि.06(का.प्र.)
शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत.
या गंभीर समस्येची दखल घेत दि.6 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने शहादा विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता श्री. योगेंद्र प्रसाद यांची प्रत्यक्ष भेट घेतली. शहरात होणाऱ्या अपुऱ्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत त्यांना सविस्तर निवेदन देऊन या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. दिनेश बागुल व उपअभियंता श्री. पुष्पेंद्र पाडवी प्रामुख्याने उपस्थित होते. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने वीज पुरवठा वारंवार का खंडित होतो? त्यामागील नेमकी तांत्रिक व प्रशासकीय कारणे कोणती? तसेच ही समस्या सोडवताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे? या सर्व बाबींवर सविस्तर विचारणा केली.नागरिकांना नाहक सहन कराव्या लागणाऱ्या त्रासावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा कडक सूचना शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना दिल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या काही दिवसांत महावितरणचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वीज ग्राहक यांची या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी एक व्यापक बैठक आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या प्रसंगी घेण्यात आला.एकंदरीत, विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली. या भेटीदरम्यान माजी नगरसेवक सुपडू खेडकर, ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत, किशोरसिंह गिरासे, रोहनकुमार माळी यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








