७/१२ संगणकीकरण रखडल्याने नागरिकांना हेलपाटे
करमाळा : तालुक्यातील तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ७/१२ उताऱ्यांचे संगणकीकरण, विविध दाखले तसेच महसुली नोंदींची कामे रखडल्याने नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
मोजे खडकी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे हस्तलिखित ७/१२ उतारे अद्याप ऑनलाइन झाले नसल्याने पीककर्ज, शासकीय योजना तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालय यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कामे लवकर करून देण्यासाठी आर्थिक मागणी होत असल्याच्या चर्चांमुळेही प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
दरम्यान, नवीन रेशन कार्ड, विविध दाखले आणि इतर प्रशासकीय कामांसाठी अर्ज करून अनेक महिने उलटूनही कामे पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप मदतीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांनी तहसील प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रखडलेली कामे मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.







