नाशिकमध्ये एका कुटुंबाने मुलीच्या लग्नात एक वेगळा आणि देशहिताचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी नागरिकांना सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. देशाचा आयात खर्च कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या फड कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी नवीन सोनं खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील जुन्याच दागिन्यांचा वापर करत साधेपणाने पण अभिमानाने हा विवाहसोहळा साजरा केला जाणार आहे.
मोदींच्या आवाहनानंतर, फड कुटुंबाचा मोठा निर्णय
नाशिक शहरातील कामटवाडे परिसरात राहणाऱ्या राजेंद्र फड यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. कन्या प्रतिमा फड हिचा विवाह दोन दिवसांनी म्हणजेच 14 मे रोजी सिन्नर तालुक्यातील सौरभ बोडके यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका लॉन्सवर धुमधडाक्यात पार पडणार आहे. घरात मांडव उभारण्यात आला आहे, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि पाहुण्यांची लगबगही वाढली आहे. पण या लग्नाची चर्चा फक्त आनंदामुळे नाही तर एका वेगळ्या निर्णयामुळे देखील आहे. लग्न म्हटलं की, नवीन सोन्याची खरेदी हा जणू परंपरेचाच भाग मानला जातो. मात्र फड कुटुंबाने यावेळी नवीन सोनं खरेदी न करता घरातीलच जुन्या दागिन्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.










