पष्टेपाडा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या पाणी योजनेचे काम पूर्ण होऊनही केवळ वीज मीटरअभावी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
२६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी या गंभीर समस्येबाबत जाब विचारला होता. त्यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षा तथा सरपंच सौ. राजश्रीताई सातवी यांनी “मीटरचे पैसे भरले असून दोन दिवसांत मीटर बसवले जाईल,” असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाला तब्बल चार महिने उलटूनही अद्याप वीज मीटर बसवण्यात आलेले नाही.
या पाणी योजनेमुळे पष्टेपाड्यातील सुमारे २० ते २५ कुटुंबांची तहान भागणार होती. योजनेचे तांत्रिक काम पूर्ण झाले असून केवळ वीज जोडणीअभावी पाण्याचा पंप सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे घरातील लहान मुले, वृद्ध आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी आक्रमक भूमिका घेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता. त्यावेळी दोन दिवसांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर दिलेल्या शब्दालाच केराची टोपली दाखवण्यात आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत वीज मीटर बसवून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पष्टेपाड्यातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.







