श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी गावात पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गावातील जाळीवस्ती, नाईक वस्ती आणि ढगेवाडी येथील वाड्या-वस्त्यांवर नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तीव्र भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे मात्र गावातील मुख्य रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात वाहून वाया जात असल्याचे दिसत आहे.
एकीकडे मुख्य रस्त्यावर पाण्याचा अपव्यय सुरू असताना दुसरीकडे वस्तीवरील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. विशेषतः महिलांना कडक उन्हात लांब अंतर पार करून पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
“मुख्य रस्त्यावर पाणी वाहतंय, पण आमच्या वस्त्यांना थेंबभरही पाणी मिळत नाही,” असा सवाल करत स्थानिक नागरिकांनी ग्रामप्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.







