उल्हासनगर : प्रतिनिधी
उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ परिसरातील कैलाश कॉलनी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे काका गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनिल चौहान (२२) आणि अमन चौहान (१७) या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला, तर अर्जुन सुरजबली चौहान हे गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास कैलाश कॉलनी चौकात नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना ७ ते ८ जणांचे टोळके हत्यारांसह तेथे आले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी चौहान कुटुंबीयांवर थेट गोळीबार सुरू केला. रस्त्यावर उघडपणे अनेक राऊंड फायर करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्यांच्या आवाजाने नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ केली.
प्राथमिक तपासात हा हल्ला अंबरनाथ गावातील एका कुख्यात गुंडा आणि कैलाश कॉलनीतील स्थानिक रहिवाशांमधील जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हल्ल्यातील काही संशयित यापूर्वीही हत्येच्या गुन्ह्यात अडकले होते आणि सध्या जामिनावर बाहेर होते.
घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अर्जुन चौहान यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून हल्लेखोरांच्या शोधासाठी चार विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.








