मुंबई : प्रतिनिधी
अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कार्य करणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्र पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनांच्या वतीने आयोजित चौथा वर्धापन दिन आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा २१ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
भव्य स्टेज सजावट, आकर्षक रोषणाई, संगीत, फटाक्यांची आतषबाजी आणि रंगीबेरंगी कागदी पताकांच्या वर्षावामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या नियोजनाचे आणि शिस्तबद्ध व्यवस्थेचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
या सोहळ्यात राज्यभरातील विविध क्षेत्रातील १२१ मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणावेळी करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि रंगीत कागदी तुकड्यांचा वर्षाव हा कार्यक्रमातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या हजारो महिला व पुरुष सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सदस्यांच्या आकर्षक फेट्यांमुळे आणि शिस्तबद्ध उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलून दिसत होती.
उपस्थितांसाठी पुरी-भाजी, जिलेबी आणि थंडगार मठ्ठ्याच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेद्रे राजेश्वर यांनी प्रभावी शैलीत केले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या भाषणाने उपस्थितांना विशेष प्रेरणा मिळाली. समाजसेवा, न्याय आणि संघटन कार्याबाबत त्यांनी मांडलेले विचार उपस्थितांच्या मनाला भिडले. त्यांच्या भाषणादरम्यान सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
कार्यक्रमास संत-महंतांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या समाजहिताच्या कार्याला आशीर्वाद देत कौतुक व्यक्त केले.
उत्कृष्ट फोटोग्राफी, व्हिडिओ चित्रीकरण आणि जल्लोषमय वातावरणामुळे हा सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पाटील डी. जी. सर आणि ए. पी. पगार सर, ज्येष्ठ राष्ट्रीय मार्गदर्शक, युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र यांनी कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.








