विशेष प्रतिनिधी
देशाच्या राजकीय पटलावर सध्या ‘कॉकरोज जनता पार्टी’ या नवोदित पक्षाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराच्या माध्यमातून या पक्षाने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले असून, दिल्लीपासून ग्रामीण भागापर्यंत पक्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या बैठका, मेळावे आणि सदस्य नोंदणी अभियानाला विशेषतः तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या ज्वलंत विषयांवर पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तरुण वर्ग या पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. पारंपारिक प्रचार पद्धतीऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.
युवा संयोजक संजय जाधव म्हणाले, “तरुणांशी थेट संवाद साधण्याची आमची कार्यपद्धती वेगळी आहे. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद हा बदलत्या राजकारणाचा संकेत आहे.”
युवा प्रगतीशील शेतकरी राहुल जगताप यांनी सांगितले की, “बेरोजगारी आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचा कल या पक्षाकडे वाढत आहे.”
तर शेतकरी संदीप काळे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “जर पक्षाने सातत्य ठेवले तर भविष्यात ही एक प्रभावी राजकीय ताकद म्हणून उदयास येऊ शकते.”
दरम्यान, पक्षाच्या प्रचारामध्ये “सिस्टीम गटर नाही, कॉकरोज जनता पार्टी” तसेच “बदलाचा संकल्प, जनतेचा विश्वास!” अशा घोषणांचा वापर करण्यात येत आहे.
डिजिटल युगातील या नव्या राजकीय प्रयोगामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेले असून, आगामी काळात या पक्षाची वाटचाल कशी राहते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








