अंबाजोगाई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. पेट्रोल पंपांवर कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई परिसरातील शेतकऱ्यांनी “आता काय विहिरीचा पाणी पंप उपटून पेट्रोल पंपावर घेऊन यायचा का?” असा संतप्त सवाल प्रशासनाला केला आहे.
शेतातील नांगरणी, पेरणी आणि मशागतीची कामे ट्रॅक्टरवर अवलंबून असताना डिझेलअभावी अनेक कामे खोळंबली आहेत. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने विहिरी आणि बोअरवेलवरील डिझेल पंप बंद पडले आहेत. परिणामी उभी पिके करपण्याच्या मार्गावर असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसते. तसेच विहिरींवरील स्थिर पंप हलवणेही शक्य नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. नियमांचा हवाला देत कॅनमध्ये डिझेल नाकारले जात असल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
उन्हाचा पारा वाढत असताना पिकांना पाण्याची नितांत गरज असते. मात्र, ऐन हंगामात इंधन टंचाई निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे. “आम्ही काळाबाजारासाठी नव्हे, तर शेतीसाठी डिझेल मागत आहोत,” असे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांना निवेदन देत तातडीने कॅनमध्ये डिझेल देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.










