पाथरी | प्रतिनिधी :
पाथरी नगर परिषदेमध्ये शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, खोटी नोंद, बनावट कागदपत्रांची निर्मिती तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून शासकीय कामकाजात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नगराध्यक्षांसह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी यांनी २१ मे रोजी पाथरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
पाच जणांची नावे तक्रारीत नमूद
तक्रारीमध्ये नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान पठाण, कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे, कर निर्धारक तथा प्रशासकीय कर्मचारी सुरेश जोशी, कर्मचारी मिना दिगंबर आगळे व श्रीमती इंगळे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
सभेतील अनियमितता आणि बनावट ठरावाचा आरोप
तक्रारीनुसार, पाथरी नगर परिषदेमध्ये स्थायी मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असताना अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांकडे प्रशासनाचा कार्यभार होता. अशा परिस्थितीत १६ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय विशेष सभा घेण्यात आली.
मात्र, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील नियमांनुसार आवश्यक गणपूर्ती नसतानाही ही सभा बेकायदेशीररीत्या घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेत कोणत्याही विषयावर चर्चा किंवा ठराव मंजूर न होता खोटी कार्यवाही नोंदविण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
अभिलेख दडपणे व जावक क्रमांकात फेरफार
१६ मार्चच्या सभेचे हजेरीपत्रक वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित अभिलेख जाणूनबुजून दडवून त्यामध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुंबरे यांनी सभेत चर्चा न झालेल्या “जुना आठवडी बाजार” या विषयाचा खोटा ठराव तयार करून तो मिनिट बुकमध्ये नोंदवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
खोट्या नोटिसा व स्वाक्षरीचा वापर
तसेच १० एप्रिल व १३ एप्रिल २०२६ रोजी नगराध्यक्षांनी स्वतःच्या स्वाक्षरीने खोट्या नोटिसा तयार केल्याचा आरोप आहे. या नोटिसांवर एकाच जावक क्रमांकाचा वापर करून तारखांमध्ये फेरफार करण्यात आला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी ११ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्रात संबंधित नोटिसांवरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
कर्मचारी व अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप
सुरेश जोशी यांनी संगनमत करून मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आवक-जावक विभागातील कर्मचारी मिना आगळे व श्रीमती इंगळे यांनी एकाच जावक क्रमांकाचा वापर करून बनावट नोटिसा तयार केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
कठोर कारवाईची मागणी
नगराध्यक्षांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट अभिलेख तयार करून शासकीय कामकाजात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बनावट दस्तऐवज तयार करणे, शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, फसवणूक, पदाचा गैरवापर आणि गुन्हेगारी कट अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात खळबळ
या गंभीर आरोपांमुळे पाथरी नगर परिषदेत खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










