शहादा | प्रतिनिधी
शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकावर गेल्या सहा महिन्यांपासून पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहादा नगर परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती तथा नगरसेविका भावना चंद्रभान कदम यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
भावना कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे की, शिवस्मारकावर प्रकाश व्यवस्था करण्याबाबत त्यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपूर्वीच लेखी अर्ज दिला होता. मात्र, सहा महिने उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, २ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांनी शिवस्मारक समितीकडून अर्ज आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, शिवस्मारक समितीने यापूर्वीच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्याकडे प्रकाश व्यवस्थेसाठी अर्ज सादर केला असून त्याची प्रतही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या स्मारकाची अशी दुरवस्था होणे दुर्दैवी आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखत स्मारकावर आकर्षक आणि पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था तातडीने करावी,” अशी मागणी भावना कदम यांनी केली आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रभान कदम व सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची भेट घेऊनही चर्चा केली आहे.
या निवेदनानंतर शहादा नगर परिषद प्रशासन शिवस्मारकावरील प्रकाश व्यवस्थेबाबत किती लवकर निर्णय घेते, याकडे शहादावासीयांसह शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.







