पातूर
आदर्श गोसेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नूतन विद्यालय, आलेगावचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात शिक्षणाची आवड वाढावी, या उद्देशाने हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला.
शालेय बॅगचे वाटप सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, “शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित झाला, तरच समाजाचा खरा विकास होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसंदर्भात दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. उंबरवाडी येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, आलेगाव येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींप्रमाणेच मुलांनाही बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयांचे ग्रामस्थांनी स्वागत करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला याचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नितीन आनंदा ढोणे, उपसरपंच बंडू डाखोरे, दीपक डुकरे, मदन शिंदे, समाधान गाढवे, केशव डाखोरे, सुकराज डाखोरे, विठ्ठल डाखोरे, राजू देवकर, दीपक धंदेरे, अरुण झाटे, सुरेश लठाड, रामदास ठाकरे, परशराम तिवाले, सुकनंदन डाखोरे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॉक्स
“शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित झाला, तरच समाजाचा खरा विकास होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे.”
— निलेश तोताराम कापकर, सामाजिक कार्यकर्ते






