आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील किन्ही आणि परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात तीव्र उकाडा जाणवत असताना अचानक आकाश ढगाळून आले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच वाऱ्याचा वेग वाढल्याने किन्ही परिसरात झाडे उन्मळून पडली.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.









