रिसोडमध्ये कामगार वर्गात नाराजी; योग्य मार्गदर्शनाची मागणी
रिसोड | प्रतिनिधी
रिसोड परिसरातील बांधकाम कामगारांनी शासनाच्या बांधकाम कामगार योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही योजना प्रत्यक्ष गरजू कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप केला आहे. अर्ज भरण्यासाठी जास्त खर्च, वारंवार सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या आणि फॉर्ममधील त्रुटींमुळे अनेक कामगार योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, रोजंदारीवर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांना अर्ज प्रक्रियेसाठी वारंवार वेळ आणि पैसे खर्च करावे लागत आहेत. अनेक वेळा अर्ज भरल्यानंतर कार्यालयातून फॉर्ममध्ये चुका असल्याचे सांगितले जाते आणि पुन्हा अर्ज भरावा लागतो. त्यामुळे कामगारांची आर्थिक व मानसिक दोन्ही प्रकारे गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
“जे खरे बांधकाम कामगार आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत नाही. दरवर्षी नूतनीकरण करूनही कोणताही फायदा होत नाही,” अशी नाराजी काही कामगारांनी व्यक्त केली.
कामगारांनी पुढे सांगितले की, कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे बाहेरील एजंटांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये अनेक कामगारांची आर्थिक फसवणूक होत असून, त्यांना विनाकारण सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
प्रशासनाने कामगारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अर्ज प्रक्रिया सुलभ करावी तसेच खऱ्या पात्र कामगारांना योजनेचा लाभ मिळेल यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कामगार वर्गातून करण्यात येत आहे.






