श्री साईं राम ग्रुप, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा स्तुत्य पुढाकार
खामगाव | प्रतिनिधी
खामगाव शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुक्या जनावरांना व गोमातेला पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होत असल्याची दखल घेत श्री साईं राम ग्रुप तसेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत सिमेंटचे पाण्याचे टाके बसविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
उन्हाळ्याच्या कडाक्यात मुक्या जीवांना पिण्याच्या पाण्याचा आधार मिळावा आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे पूजन विहिंप जिल्हामंत्री राजेंद्रसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत “गोसेवा हीच ईश्वरसेवा” असल्याचे सांगितले. तसेच समाजातील प्रत्येकाने अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी साईराम ग्रुपचे अध्यक्ष मयूर शर्मा, महेश मोरजानी, आनंद खराटे, आकाश अग्रवाल, ईशान खिरलकर, बंटी मोरजानी, देवा गोस्वामी, शुभम डब्बे, निखिल भाटे, सौरभ गोंड, निखिल दरियानी, राजेश भट्टड, भावेश नथानी, सुमित पवार, अतुल संत, रवि अडरेजा, सोनू गुरबाणी, सुंदर नथानी, पंकज माडीवाले, बंटी शर्मा, सागर पंजाबी यांच्यासह श्री साईं राम ग्रुप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील विविध भागांत बसविण्यात आलेल्या या पाण्याच्या टाक्यांमुळे उन्हाळ्यात मुक्या जनावरांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.






