जामखेड | प्रतिनिधी
जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. नामांतराच्या मागणीसंदर्भात अनेक वेळा निवेदने, पाठपुरावा आणि मागण्या करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, जामखेड तालुक्याला एक आमदार तसेच विधान परिषदेत दोन आमदारांचे प्रतिनिधित्व असतानाही नगर परिषद नामांतराच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. नगर परिषद नामांतराचा प्रस्ताव प्रलंबित राहण्यामागे विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. तसेच, “आचारसंहिता लागू असताना जिल्हा परिषदेमधील बदल्या कशा होतात?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या नावाने नगर परिषदेला ओळख मिळणे ही जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणस्थळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक आणि नागरिकांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. “अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या”, “जामखेड नगर परिषद नामांतराचा निर्णय तातडीने घ्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी ह.भ.प. विधीतज्ञ महारुद्र नागरगोजे, माजी जामखेड ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब श्रीरामे, माजी संचालक जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सागर सदाफुले, सचिन काशीद, विकी पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






