शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)
शहादा शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून शहरातील मुख्य चौकांमध्ये तैनात असलेला पोलीस बंदोबस्त केवळ नावापुरताच उरल्याची संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. शहरातील गजबजलेल्या चौकांमध्ये पोलिसांच्या देखतच वाहतुकीच्या नियमांचे धिंडवडे निघत असून पोलीस मात्र मुक्या बहिऱ्याची भूमिका घेत असल्याने ‘खाकी’चा धाक उरला आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,शहरातील अत्यंत वर्दळीच्या नगरपालिका चौकात सायंकाळच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. मात्र असे असतानाही अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वन वे असूनही उलट दिशेने सर्रास वाहने चालवताना दिसतात. विशेष म्हणजे साधारणत: ८ ते १० पोलीस कर्मचारी या ठिकाणी हजर असतात. परंतु कारवाई करण्याऐवजी हे कर्मचारी एकमेकांशी गप्पा मारण्यात किंवा मोबाईलवर बोलण्यातच मग्न असतात. त्यांच्या डोळ्यादेखत हा सगळा प्रकार सुरू असतानाही ते केवळ ‘बघ्याची’ भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नगरपालिका चौकासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडी धारकांनीही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटला आहे. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे येऊन या हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या वाहतूक कोंडीत सामान्य नागरिक, महिला आणि रुग्णवाहिका अडकून पडतात, मात्र रस्त्यावर उभे असलेले पोलीस याकडे पूर्णपणे कानाडोळा करतात.शहरातील गजबजलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, नगरपालिका चौक, आणि खेतिया रस्ता चौफुली या प्रमुख ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला असतो.
मात्र, या बंदोबस्ताचा वाहतूक नियंत्रणासाठी काडीचाही उपयोग होत नसल्याने हा बंदोबस्त ‘बिनकामाचा’ ठरत आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरात दररोज वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा पाहायला मिळत आहे.शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आता अनिवार्य झाले आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेजबाबदार वाहनधारकांवर आणि अतिक्रमणावर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे. शहाद्याची सद्यस्थिती पाहता पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र आहे. हे चित्र तातडीने बदलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सुज्ञ शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.शहरातील या गंभीर परिस्थितीकडे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. गप्पा मारण्यात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक सूचना देऊन, नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल का? की शहादाकर असेच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले राहतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









