शहादा,दि.२७(का.प्र.)
नंदुरबार जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा व वाढत्या तापमानामुळे पिकांची नासाडी होत असून, त्यातच महावितरणच्या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. मामाचे मोहिदा येथील शेतकऱ्यांनी ४८ तासांत अवघा ४ तास वीज पुरवठा मिळत असल्याने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत निवेदन दिले.
याबाबत अधिक वृत्त असे,दिवसा थ्री-फेज वीज पुरवठा करण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते, मात्र सध्या जिल्ह्यात ८ ते १० तास मिळणाऱ्या विजेमध्येही वारंवार ट्रिपिंग होत असल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी जळत आहेत. यामुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय संयोजक विजय चौधरी, प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ,
जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील व सर्व तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून महावितरण आणि प्रशासनाकडे तातडीने सौर ऊर्जा प्रकल्प (सोलर प्लांट) उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेल्टी, नांदरखेडा, पळसवाडा, वरूळ, कानडी, बिलाडी, बामखेडा, ससदा, सावलदा, अनरद, पुसनद, मामाचे मोहिदा, सोनवद, कौठळ, कळंबू, काहतूळ, कुकावल आणि कोठली या परिसरातील पडीत जमीन, गावठाण व वनीकरण विभागाची जागा यासाठी तातडीने उपयोगात आणण्यात यावी. या जागांवर तातडीने सौर ऊर्जा प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करून ते कार्यान्वित करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळेल आणि अन्नदात्याचे होणारे नुकसान थांबेल, अशी आग्रही मागणी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती किसान मोर्चाचे विनोद पाटील यांनी दिली.











