रिसोड | प्रतिनिधी
रिसोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत असताना, दुसरीकडे शहरातील जैन मंदिर ते माळी गल्ली या परिसरात नळाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. या भागात नळाचे पाणी थेट नाल्यावरून वाहत असून त्यामुळे हजारो लिटर पाण्याची दररोज नासाडी होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये पाण्याचा साठा मर्यादित असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र जैन मंदिर ते माळी गल्ली परिसरात पाणी रस्त्यावर व नाल्यात वाहून जात असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी नळांना कॉक नसल्यामुळे किंवा गळती होत असल्यामुळे पाणी सतत वाहत राहते. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून काही भागांतील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठ्याच्या वेळी नळांमधून बाहेर पडणारे पाणी थेट नाल्यात मिसळत असून त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे एकीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे मौल्यवान पिण्याचे पाणी नाल्यात वाहून जात आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याशिवाय रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे पादचारी व वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चिखल आणि घसरडे वातावरण निर्माण होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी नळांना कॉक नाहीत तेथे त्वरित कॉक बसविणे, गळती असलेले नळ दुरुस्त करणे, पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित तपासणी करणे आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“पाणी हेच जीवन” या उक्तीप्रमाणे प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने तसेच नागरिकांनीही पाणी बचतीबाबत जागरूक राहून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जैन मंदिर ते माळी गल्ली परिसरातील नागरिकांनी केली आहे.



