बीड जिल्ह्याचा गौरव: कुमार कार्तिक संतोष भवर याला पंढरपूरमध्ये प्रतिष्ठेचा ‘अक्षररत्न पुरस्कार २०२६’ प्रदान
आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते विशेष सत्कार; आष्टी तालुक्यासह जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव*
आष्टी / प्रतिनिधी: शशिकांत जरांगे
‘माझी शाळा माझा फळा’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, सुंदर हस्ताक्षर आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी दिला जाणारा २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘अक्षररत्न पुरस्कार’ यंदा बीड जिल्ह्यातील कुमार कार्तिक संतोष भवर याला पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला. अक्षरक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उत्कृष्ट गुणवत्तेची दखल घेऊन कार्तिकला या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा बहुमान मिळवणारा तो बीड जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्थानिक पातळीवरही कार्तिकच्या यशाची मोठी दखल घेण्यात आली असून, आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांनी कार्तिक संतोष भवर याचा विशेष सत्कार करत त्याला पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कठोर परिश्रम आणि मार्गदर्शनाचे फळ
लहान वयातच सुंदर हस्ताक्षर, प्रगल्भ लेखनकौशल्य, वाचनाची आवड आणि अभ्यासातील कमालीचे सातत्य यांमुळे कार्तिकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पुरस्कारामुळे त्याच्या शैक्षणिक वाटचालीत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कार्तिकने मिळवलेल्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
डिजिटल युगातही अक्षरांचे महत्त्व कायम
या पुरस्काराचे मुख्य प्रेरणास्थान असलेले श्री. अमित भोरकडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सुलेखन कला आणि ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. “माझा फळा माझी शाळा” या उपक्रमाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना व शैक्षणिक क्षमतेला वाव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी कार्तिकच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगातही हस्ताक्षर, वाचन आणि लेखन यांचे महत्त्व कमी झालेले नाही. कार्तिक सारख्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने इतर विद्यार्थ्यांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल.”
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
कार्तिक संतोष भवर याला मिळालेला ‘अक्षररत्न’ पुरस्कार हा केवळ त्याचा वैयक्तिक सन्मान नसून त्याच्या शाळेचा, शिक्षकांचा आणि संपूर्ण बीड जिल्ह्याचा गौरव आहे. या यशाबद्दल गटविकास अधिकारी (BDO), स्थानिक सरपंच, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी (BEO) आणि ग्रामस्थांनी कार्तिकचे प्रत्यक्ष भेटून व विविध माध्यमांतून कौतुक केले आहे. शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर भविष्यातही तो अशीच मोठी यशस्वी भरारी घेईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.










