ब्लॅक स्पॉटवर तातडीच्या उपाययोजना; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
वारंवार होणाऱ्या अपघातांवर लगाम घालण्यासाठी रोड अॅक्सिडेंट कमिटी सक्रिय
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी शत्रुघ्न घाडगे इंदापुर : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारंवार अपघात घडणाऱ्या धोकादायक ठिकाणांवर (ब्लॅक स्पॉट) नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण आणि अपघातमुक्त परिसर निर्मितीच्या उद्देशाने नुकतीच पोलीस ठाणे स्तरावरील ‘रोड अॅक्सिडेंट कमिटी’ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अपघातग्रस्त ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. संबंधित ठिकाणी अपघात होण्यामागील कारणे, वाहतुकीतील अडथळे आणि आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सौरभ देसाई, बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक संजय भापकर, पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर तसेच आनंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंच रोहित मोहोळकर उपस्थित होते.
अपघातप्रवण ठिकाणांची ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून नोंद करून त्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये स्पीड ब्रेकर उभारणे, रस्त्यांवर पांढऱ्या सीमारेषा व रोड मार्किंग करणे, रिफ्लेक्टर आणि ‘कॅट आय’ बसविणे, तसेच धोकादायक वळणांवर सूचना फलक उभारणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
याशिवाय वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अपघातांच्या घटनांचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक आयोजित करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. नागरिकांची सुरक्षा हीच प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, वालचंदनगर परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणा कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.







