
दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याची भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांची मागणी
करमाळा | प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प आणि भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडावे तसेच उजनीकाठावरील शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भाजप जिल्हा युवा नेते तथा मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे.
दिग्विजय बागल यांनी सांगितले की, जून महिना संपून जुलैचा निम्मा कालावधी उलटल्यानंतरही करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक मध्यम प्रकल्प, तलाव आणि स्थानिक पाणीसाठे कोरडे पडले असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या चांगल्या पावसामुळे उजनी धरणात सुमारे ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून लाभक्षेत्रातील अनेक धरणेही मोठ्या प्रमाणात भरली आहेत. त्यामुळे उजनी धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा लाभ करमाळा तालुक्यालाही तातडीने मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
यंदा शेतकऱ्यांनी तुटपुंज्या पावसाच्या भरोशावर खरीप पेरण्या केल्या आहेत. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची उगवण समाधानकारक झालेली नाही. पावसाची ओढ कायम राहिल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प आणि भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याबरोबरच उजनीकाठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे.
दरम्यान, पावसाअभावी तालुक्यातील विहिरी, कूपनलिका आणि लहान पाणीप्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पाणी व वीजपुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
