
लोहा प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील देऊळगाव परिसरात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली असली, तरी त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत. सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने उगवलेली पिके आता वाळू लागली आहेत.
सध्या शेतातील माती कोरडी पडली असून पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत असून काहींना दुबार पेरणीचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पावसाअभावी विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळीही घटू लागली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



