येवला | प्रतिनिधी (जनार्दन जाधव)
येवला-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्ट्या न भरल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी रस्त्याची उंची वाढल्यानंतर नियमानुसार मुरूम किंवा माती टाकून बाजूच्या साईडपट्ट्या समतल करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी डांबरी रस्ता आणि कच्च्या रस्त्यामध्ये मोठा उंचीचा फरक निर्माण झाला असून हा खटका वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या वाहनांना साईड देताना किंवा रस्त्याच्या कडेला वाहन घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या कडेला अचानक निर्माण झालेल्या उंचीच्या फरकामुळे दुचाकींचा तोल जात असून अनेक वाहने घसरून पडत आहेत.
मंगळवारी या मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान परिस्थिती अधिकच गंभीर बनली. ट्रॅफिक जाममधून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला वाहन घेतले. मात्र, साईडपट्टी नसल्याने वाहनांचे चाक अचानक खाली गेल्यामुळे अनेक जण घसरून पडले. या अपघातांमध्ये काही जण किरकोळ जखमी झाले तर काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी कोणतेही सूचना फलक, धोक्याचे इशारे किंवा वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील या धोकादायक परिस्थितीची कल्पना नसते आणि ते अपघाताला बळी पडतात.
स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि प्रवाशांनी सांगितले की, येवला-मनमाड महामार्ग हा परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्याचे काम दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामामध्ये सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे..
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्वरित मुरूम टाकून साईडपट्ट्या समतल कराव्यात, धोकादायक ठिकाणी सूचना फलक उभारावेत आणि वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, अपघातांची संख्या वाढण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती स्थानिक नागरिक आणि वाहनधारक व्यक्त करत आहेत. महामार्गावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.











