
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ या उपक्रमास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, उपशिक्षण अधिकारी सचिन अनंतकवळस आणि भाऊसाहेब सरक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उल्लास-नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे कौतुक करत, या माध्यमातून साक्षरता, नशामुक्ती आणि रस्ता वाहतूक सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती होत असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी यांनी आरएसपी (Road Safety Patrol) अधिकारी-शिक्षक युनिटच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, ट्रॅफिक सेन्स विकसित करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीचे महत्त्व विशद केले. या कार्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आरएसपी अधिकारी-शिक्षक युनिटचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी केंद्रप्रमुख अजित नांगरे, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, युट्युबर राजेंद्र जगे, ह.भ.प. गणेश महाराज भगत, जोशी महाराज, आरएसपी अधिकारी-शिक्षक संजय खैरनार, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी साक्षरता वारी प्रकल्पाचे उद्दिष्ट, नियोजन आणि समाजातील विविध घटकांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट करत हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
