सारथी महाराष्ट्राचा न्यूज | श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत नागरिक, व्यापारी आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी पोलिस अधीक्षक (एसपी) घटनास्थळी येईपर्यंत मृतदेहाचा अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली. सुमारे चार तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट देत आठ दिवसांत कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नितीन दिनकर, सचिन गुजर, सभापती सुधीर नवले, दुबैया कुटुंबीय, व्यापारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप मुटकुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
आंदोलनादरम्यान अनेकांनी शहरातील संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाईची मागणी केली. काही आंदोलकांनी गंभीर आरोप करत, शहरातील काही गुन्हेगारी टोळ्या गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, आरोपींवर मोक्का लावण्याबाबतचा अंतिम निर्णय हा तपासातील पुरावे आणि संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार घेतला जाणार आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू असून, कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
