रावेर | प्रतिनिधी
रावेर शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून तो अनेक दिवसांपासून उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शहरात दररोज नियमित साफसफाई करण्यात यावी, या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
युवासेना शहर प्रमुख निलेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात पावसाळ्यापूर्वी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच काही ठिकाणी साफसफाईचे काम अपुरे होत असतानाही संबंधित मक्तेदारांकडून बिले काढून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शहरात समाधानकारक स्वच्छता होईपर्यंत मक्तेदारांची बिले मंजूर करू नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनाद्वारे नगरपालिका हद्दीतील सर्व भागांमध्ये दररोज कचरा संकलन करणे, नियमित साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त कचरापेट्या उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शहरातील बाजारपेठ, शाळा, रुग्णालय परिसर आणि निवासी भागांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शहर स्वच्छ व निरोगी ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या वेळी युवासेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.









