भूम | प्रतिनिधी
भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गाव गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असून विजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे परिसरातील इतर गावांना सुरळीत वीजपुरवठा होत असताना चिंचपूर ढगे येथे वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चिंचपूर ढगे गावाचा वीजप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाला वालवड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच चिंचपूर ढगे ते वालवड दरम्यान वीजवाहिनी उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सर्व कामे पूर्ण होऊनही अद्याप गावाला वालवड सबस्टेशनवरून विजपुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या सबस्टेशनच्या कामावरून स्थानिक राजकीय स्तरावर श्रेयवादही रंगला होता. आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांकडून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांना नियमित व अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याने श्रेयवादापेक्षा प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या चिंचपूर ढगे, साडेसांगवी, गोलेगाव आणि नवलगाव या चार गावांचा वीजपुरवठा भूम सबस्टेशनअंतर्गत असलेल्या चिंचपूर फीडरवरून केला जातो. मात्र, विजपुरवठ्यात बिघाड झाल्यास अनेकदा केवळ चिंचपूर ढगे आणि साडेसांगवी ही गावे अंधारात ठेवली जातात, तर गोलेगाव आणि नवलगाव येथील पुरवठा सुरू ठेवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गोलेगाव आणि नवलगावकडे जाणारी मुख्य वीजवाहिनी एबी स्विचच्या माध्यमातून स्वतंत्रपणे सुरू ठेवली जाते, तर चिंचपूर ढगे आणि साडेसांगवीचा वीजपुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे या दोन गावांतील नागरिकांना वारंवार वीजटंचाईचा सामना करावा लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
चिंचपूर ढगेसह परिसरातील गावांना तातडीने नियमित वीजपुरवठा सुरू करून वालवड सबस्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.











