शिरूर | प्रतिनिधी
भावी पिढीला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करून निरामय, तणावमुक्त आणि सुदृढ समाज घडविण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच शिरूर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘व्यसनमुक्त आणि तणावमुक्त महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ या जनजागृती अभियानाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे उत्साहात झाला.
हे अभियान शिरूर तालुक्यातील गावागावांत पोहोचणार असून ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांना व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ सेवेसह महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या कार्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी डायल ११२ आणि दामिनी पथकाच्या कार्याची माहिती दिली, तर ग्रामीण रुग्णालय शिरूर (एनसीडी क्लिनिक) येथील समुपदेशक राजेश जाधव यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व विशद केले. अभियानाबाबतची सविस्तर माहिती संस्थेचे अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर यांनी दिली.
अभियानाची पंचसूत्री उद्दिष्टे
- व्यसनाधीन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करणे.
- शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यसनविरोधी आणि गुन्हेगारी प्रतिबंधक जनजागृती करणे.
- आरोग्य, योग व मानसिक स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन करणे.
- व्यसनमुक्त व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
- तरुणांना रोजगारक्षम बनवून चुकीच्या मार्गापासून परावृत्त करणे.
या अभियानात विविध शासकीय विभागांचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसखी, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सामाजिक संस्था, महिला बचत गट, शिक्षक, पत्रकार आणि स्थानिक गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या अंगणवाडी सेविका, ग्रामसखी, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे.
यावेळी राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, समुपदेशक राजेश जाधव, बाबुराव पाचंगे, मच्छिंद्र जामदार, अशोक पवार, नगरसेविका सविता राजापूरे, बळवंत कुंभार, विवेक जगदाळे, प्रकाश कुंभार, राणीताई कर्डीले, सविता बोरुडे, डॉ. वैशाली साखरे, रेश्मा शेख, अर्जुन बढे, अरुणकुमार मोटे, निलेश वाळुंज, बबन वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
व्यसनमुक्त, निरोगी आणि जागरूक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, समाजातील सर्व घटकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











