शिरूर | प्रतिनिधी
शिरूर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून शहरातील सर्व अतिक्रमणांवर समान व निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, नगरपरिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हातावर पोट असलेल्या नागरिकांवर, हातगाडी चालकांवर आणि लहान व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. मात्र काही प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेषतः कानोबा मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून विविध प्रकारची अतिक्रमणे अस्तित्वात असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अतिक्रमण कारवाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे सर्वांवर समान निकषांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांशी दमदाटीची व अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही गरीब व आजारी नागरिकांनी आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही असंवेदनशील वर्तन झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
लोकशाही व्यवस्थेत प्रशासनाने सर्व नागरिकांशी समान व सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी असल्याचे मत विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी व्यक्त केले आहे.
निवेदनाद्वारे त्यांनी शिरूर शहरातील सर्व अतिक्रमणांवर कोणताही भेदभाव न करता समान निकषांवर कारवाई करावी, कानोबा मंदिर परिसरातील प्रलंबित अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना विशाल उर्फ बंटी जोगदंड म्हणाले, “शिरूर शहरातील अतिक्रमण कारवाई पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वांसाठी समान असली पाहिजे. गरीबांवर कठोर कारवाई आणि प्रभावशालींना मोकळीक देण्याची भूमिका नागरिकांच्या न्यायभावनेला धक्का देणारी आहे. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता कायद्याची समान अंमलबजावणी करावी.”




