दोडामार्ग | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून समाज जागृती मंच, दोडामार्ग यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम श्री महेश मोहन जाधव यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, छत्री, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला समाज जागृती मंचचे अध्यक्ष दिपक जाधव, उपाध्यक्ष गोविंद कदम, सचिव संतोष कदम, खजिनदार महेश जाधव, सदस्य भगवान जाधव, सदस्य कैतान डिसोझा, भारतीय बौद्ध महासभा दोडामार्ग तालुका सचिव आनंद सम्राट, रिपाइं दोडामार्ग तालुका सचिव नकुळ कांबळे, घोटगे ग्रामपंचायत सदस्या मंदिरी जाधव, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, गोपाळ जाधव, संतोष जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिपक जाधव होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव संतोष कदम यांनी केले.
यावेळी अध्यक्ष दिपक जाधव यांनी समाज जागृती मंचच्या कार्याचा आढावा घेत संस्थेचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. दोडामार्ग येथे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी संस्था गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत असून या कामाची सुमारे ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सामाजिक कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सभासद म्हणून सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शैक्षणिक साहित्य वाटपाच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वागत केले असून समाजोपयोगी कार्याबद्दल समाज जागृती मंचचे कौतुक करण्यात येत आहे.










